
विवाह हा विश्वास, निष्ठा आणि भावनिक बांधिलकीचा पवित्र बंध मानला जातो. मात्र, एका नव्या अहवालात देशातील अनेक शहरांमध्ये विवाहबाह्य संबंधांची वाढती प्रवृत्ती उघड झाली आहे. ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या जून 2025 मधील अहवालानुसार, कांचीपुरम हे शहर ‘विवाहबाह्य संबंधां’मध्ये अव्वल ठरले आहे. गेल्या वर्षी 17व्या क्रमांकावर असलेले कांचीपुरम यंदा थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून, या वाढीने तज्ज्ञांनाही धक्का बसला आहे.
टॉप 10 यादीत पुण्याचा समावेश
या यादीत दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील तब्बल नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. सेंट्रल दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, साउथ वेस्ट, ईस्ट, साउथ, वेस्ट आणि नॉर्थ-वेस्ट दिल्ली हे जिल्हे ‘टॉप 20’ मध्ये आले आहेत. पुणे आठव्या क्रमांकावर असून, त्यानंतर बेंगळुरू (9वा) आणि साउथ दिल्ली (10वा) क्रमांकावर आहेत.
टॉप 10 शहरांची क्रमवारी (2025) 1. कांचीपुरम, 2. सेंट्रल दिल्ली, 3. गुरुग्राम, 4. नोएडा, 5. साउथ वेस्ट दिल्ली, 6. देहरादून, 7. ईस्ट दिल्ली, 8. पुणे, 9. बेंगळुरू, 10. साउथ दिल्ली यानंतर 11) चंदीगड, 12) लखनौ, 13) कोलकाता, 14) पश्चिम दिल्ली, 15) कामरूप, 16) उत्तर-पश्चिम दिल्ली, 17) रायगड (छत्तीसगड), 18) हैदराबाद, 19) गाझियाबाद आणि 20) जयपूर या शहरांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे विश्लेषण…
महानगरांतील व्यस्त जीवनशैली, सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर, दीर्घ कामाचे तास आणि वैवाहिक नात्यातील भावनिक दुरावा हे घटक या प्रवृत्तीला चालना देत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. काही जणांना नव्या नात्यांचा थ्रिल आणि भावनिक पूर्ततेचा शोध असतो. तसेच ओटीटीवरील कंटेंट अशा संबंधांना सामान्य आणि ग्लॅमरस दाखवतो, ज्यामुळे अपराधीपणाची भावना कमी होत असल्याचेही निरीक्षण आहे.
पुण्यातील स्थिती…
पुण्यातील मोठी विद्यार्थीवर्गाची उपस्थिती, आयटी आणि सेवा क्षेत्रातील तरुण व्यावसायिक, तसेच देशभरातून होणारे स्थलांतर यामुळे शहरात बहुसांस्कृतिक वातावरण तयार झाले आहे. वाढती नाइटलाइफ, सामाजिक स्वातंत्र्य आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे ‘नवे कनेक्शन’ तयार होण्याचा वेग वाढला आहे. परिणामी, काही जण विवाहबाह्य किंवा मुक्त नात्यांकडे वळत असल्याचे ट्रेंड विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, हा संपूर्ण समाजाचा चेहरा असा अर्थ नसून, बदलत्या शहरी जीवनशैलीतील काही प्रवृत्तींचा हा परिणाम असल्याचे ते स्पष्ट करतात.
तज्ज्ञांचा सल्ला…
डिजिटल तंत्रज्ञान आणि खास विवाहितांसाठी डिझाइन केलेल्या डेटिंग ॲप्समुळे कनेक्ट होणे अधिक सोपे झाले आहे. मात्र, सततची धावपळ, संवादाचा अभाव आणि भावनिक अंतर वाढल्याने नात्यांचा समतोल ढासळू शकतो. तज्ज्ञांच्या मते, ‘ओपन कम्युनिकेशन’, समुपदेशन आणि नात्यातील अपेक्षा स्पष्ट ठेवणे हे नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी आवश्यक आहे.
Editer sunil thorat




