मुंबईत दहीहंडीच्या उत्साहात दोन गोविंदांचा मृत्यू, ७५ जखमी; जोगेश्वरी व घाटकोपरमध्ये दहा थरांचा विक्रम…

मुंबई : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि पावसाच्या सरींमध्ये मुंबई आणि ठाण्यात यंदाची दहीहंडी रंगली. उत्साह आणि रोमांच यांचा शिखर गाठत गोविंदांनी नऊ थरांचा जुना विक्रम मोडून दहा थरांचा नवा विश्वविक्रम रचला. मात्र, या जल्लोषात दुर्दैवाने दोन गोविंदांचा मृत्यू झाला, तर ७५ जण जखमी झाले.
अपघातात दोनांचा मृत्यू…
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथे हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी यांचा मृत्यू झाला. तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी यांचा देखील मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांमुळे आनंदोत्सवावर शोककळा पसरली.
जखमींची आकडेवारी…
दिवसभरातील विविध अपघातांत ७५ गोविंद जखमी झाले. त्यांना केईएम, नायर, सायन, शताब्दी आणि जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, ३२ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर ४३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
दहा थरांचा विक्रम…
जोगेश्वरीतील कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या आयोजनात दहा थरांचा विक्रम रचून २५ लाखांचे बक्षीस पटकावले. याआधी नऊ थरांचा विक्रम नोंदवला गेला होता. घाटकोपर पश्चिमेच्या अमृतनगरमध्ये मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकानेही विक्रमी दहा थर रचून उपस्थितांची दाद मिळवली.
पावसातही न थांबलेले उत्सव…
मुंबई, ठाणे, वरळी, घाटकोपर, कांदिवली, मागाठाणे, मुलुंड, दादर, बोरिवली यांसह अनेक भागांत सकाळपासून गोविंद पथकांनी सहभाग नोंदवला. लाखो रुपयांची बक्षिसे, राजकीय नेत्यांचे भव्य आयोजन आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. पावसाच्या सरींमध्येही गोविंदांचा उत्साह, जिद्द आणि टीमवर्क यामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा विक्रमी व संस्मरणीय ठरला.
Editer sunil thorat






