एकेकाळी गुरे राखणारी तरुणी आज वर्ध्याची कलेक्टर ; वाचा वनमतींची संघर्षगाथा…

वर्धा : स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचे असते. मात्र, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न पूर्ण करणारे विद्यार्थी मोजकेच असतात. अशाच प्रेरणादायी वाटचालीची कहाणी आहे तामिळनाडूच्या सी. वनमती यांची. लहानपणी गुरे राखणारी ही साधी ग्रामीण मुलगी आज वर्धा जिल्ह्याची कलेक्टर बनली आहे.
गरीबीतून शिक्षणाची वाटचाल…
वनमती यांचा जन्म तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम येथे झाला. वडील टॅक्सीचालक असल्याने घरची आर्थिक परिस्थिती कठीण होती. शाळेतून आल्यावर त्या घरची जनावरे राखत, छोट्या-मोठ्या कामातून आई-वडिलांना हातभार लावत. तरीही अभ्यासाची आवड कायम ठेवली.
लग्नाऐवजी शिक्षणाचा निर्णय…
बारावीनंतर नातेवाईकांनी लग्नासाठी दबाव टाकला. मात्र वनमती यांनी शिक्षणाची निवड केली. पालकांनीही पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली आणि पुढील वाटचालीला दिशा मिळाली.
प्रेरणा ठरली महिला कलेक्टर आणि टीव्ही मालिका…
वनमतींना दोन घटनांमुळे आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. गावाला आलेल्या एका महिला कलेक्टरची भेट आणि ‘गंगा यमुना सरस्वती’ या मालिकेतील महिला आयएएस पात्राने त्यांना प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवण्याचा निश्चय केला.
कष्टांमधून मिळवले यश…
पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचूनही यश न मिळाल्याने वनमती निराश न होता अभ्यास करत राहिल्या. इंडियन ओव्हरसीज बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करत असतानाही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. अनेक अडचणींवर मात करत 2015 मध्ये त्यांनी यूपीएससीमध्ये 152 वी रँक मिळवली. महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर मुंबईत काम करून सध्या त्या वर्ध्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.



