
पुणे : कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची जोड मिळू लागल्याने आंबा उत्पादन क्षेत्रात नवे बदल घडू लागले आहेत. बदलत्या हवामानाचा फटका, उत्पादनातील अनिश्चितता आणि गुणवत्तेबाबत वाढती स्पर्धा लक्षात घेऊन आता आंबा उत्पादक आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत. पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेत देवगड हापूस आंब्याची पेटी भेट देत कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या त्यांच्या समोर मांडल्या.
राहुल शेवाळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोकणावरील प्रेमातून देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी केली. पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आंबा उत्पादन अधिक दर्जेदार आणि स्पर्धात्मक होऊ शकते, या उद्देशाने त्यांनी आपल्या बागेत AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. हवामानातील बदल, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याचे व्यवस्थापन, उत्पादनाचे नियोजन आणि गुणवत्तेची तपासणी यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनिंग मशीनची आवश्यकता त्यांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडली. हे मशीन आंब्याचा दर्जा, गोडवा, आतील गुणवत्ता आणि निर्यातीसाठी उपयुक्तता तपासण्यास मदत करते. मात्र या मशीनची किंमत सुमारे ४० ते ५० लाख रुपये असल्याने सामान्य शेतकरी किंवा लहान बागायतदारांना ती खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने अशा आधुनिक उपकरणांवर विशेष अनुदान योजना जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी देवगड हापूसमध्ये वाढत चाललेल्या ‘साका’ समस्येकडेही कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. हवामान बदलामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होत असून, साका रोगामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येवर सखोल संशोधन होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
राहुल शेवाळे यांनी सांगितले की, कोकणातील हापूस आंबा हा केवळ फळ नसून कोकणच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास देवगड हापूसची गुणवत्ता जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे सादर करता येईल. निर्यात वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राहुल शेवाळे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत दिल्लीमध्ये सविस्तर चर्चेसाठी निमंत्रित केले. आंबा उत्पादकांच्या समस्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी खासदार मेघा कुलकर्णी, सिद्धार्थ शेवाळे आणि सार्थक शेवाळे उपस्थित होते.
पारंपरिक कोकणी हापूस आणि आधुनिक AI तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न भविष्यात देवगड हापूसला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळवून देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat






