
लोणी काळभोर, ता. ३१ : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या बळावर हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कु. आरती रविंद्र सकट हिने मुंबई पोलीस दलात निवड मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत १५० पैकी तब्बल १२४ गुण मिळवत तिने नेत्रदीपक कामगिरी केली असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या आरतीने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. तिचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर लहान भाऊ टायरच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावतो. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबाने आरतीच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही.
आरतीने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका रुग्णालयात स्वागतकक्षावर नोकरी करत कुटुंबाला आधार दिला. २०२३ पासून ती पोलीस भरतीची तयारी करत होती. वनविभागाच्या जागेतील पत्र्याच्या साध्या घरात राहूनही तिने आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आणि संघर्षाची वाट निवडली.
विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या अकॅडमीचे मार्गदर्शन न घेता, केवळ मैदानावरील सरावासाठी मोहम्मद शेख यांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर आरतीने हे यश मिळवले. रुग्णालयातील कामादरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेचा अभ्यासासाठी उपयोग करत तिने स्वतःच्या ज्ञान, आत्मविश्वास आणि कष्टांच्या जोरावर पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले.
आरतीच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या जिद्दीचे, संघर्षाचे आणि आई-वडिलांच्या कष्टाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“हे यश अंतिम नाही; पोलीस निरीक्षक होण्याचे स्वप्न”
यशाबद्दल बोलताना आरती सकट म्हणाली, “देशसेवेची भावना आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. या यशामागे आई-वडील आणि भावाचा विश्वास व पाठिंबा हेच माझे खरे बळ ठरले. मात्र हेच अंतिम ध्येय नसून, पुढील स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदावर पोहोचण्याचा माझा निर्धार आहे.”
Editer sunil thorat



