
मुंबई : राज्यातील प्रलंबित शिक्षकभरती, रिक्त पदे आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवयुनिटी फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची विधानभवनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.
शिवयुनिटी फाउंडेशनच्या वतीने शिक्षक भरती प्रक्रियेतील विलंब, पवित्र पोर्टलवरील अडचणी, रिक्त पदे न भरणे, तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांकडून रिक्त पदांची माहिती पोर्टलवर न देणे या गंभीर मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेत शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या जून महिन्यापर्यंत नव्या शिक्षकांची भरती पूर्ण करून त्यांना शाळांवर रुजू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ज्या खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची माहिती देत नाहीत किंवा भरती प्रक्रियेत सहकार्य करत नाहीत, त्या संस्थांवर शासनाकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव Tushar Mahajan, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव Ranjit Singh Deol, उपसचिव Abasaheb Kawale, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी माखने आणि काळे उपस्थित होते.
दरम्यान, आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधींनी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दर्शविला. शिक्षक आमदार Dnyaneshwar Mhatre, आमदार Jayant Patil तसेच शिवसेना गटनेत्या Shubhangi Patil यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्यांना समर्थन दिले.
या शिष्टमंडळामध्ये शिवयुनिटी फाउंडेशनच्या प्रसिद्धीप्रमुख जयश्री वाबळे झवरे, कार्याध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, सचिव प्रा. बाबासाहेब बेलेकर आणि अध्यक्ष प्रा. बालुशा माने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा सुरूच राहणार असून “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” हा आवाज राज्यभर पोहोचविण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat





