खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेली विद्यार्थीनी अकाली हरपली…

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील पाळू गावातील शेतकरी कुटुंबातून पुढे येत स्पर्धा परीक्षेत राज्यभर नावलौकिक मिळवलेली अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिचे दुर्दैवी निधन झाले. २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिने उल्लेखनीय यश मिळवले होते.
मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर सुरू असलेल्या तिच्या मृत्यूशी झुंजीचा शेवट अखेर झाला.
२८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासानंतर अंघोळीसाठी पाणी तापवताना हिटरचा धक्का बसला आणि उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली. तत्काळ उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, उपचारादरम्यान अखेर तिचा मृत्यू झाला.
अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत खेड तालुक्यात मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी उदारतेने मदतही केली. तरीसुद्धा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रयत्नांनंतरही तिचा जीव वाचवता आला नाही.
जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून ती सातत्याने प्रयत्नशील होती. पण अकाली निधनामुळे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. अश्विनीच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका, विद्यार्थी वर्ग आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Editer sunil thorat



