अजितदादांना उद्या अखेरचा निरोप ; अंत्ययात्रा मार्ग व मुखाग्नीची वेळ जाहीर…

बारामती (पुणे) : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आज एका भीषण विमान अपघातात शांत झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनतेचे लाडके नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आज सकाळी बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी येत असताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. ही बातमी कळताच बारामतीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि नागरिक अंतिम दर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले आहेत.
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिल्लीमध्ये असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत व्हॉट्सॲप स्टेटसवर “Devastated” असा शब्द लिहिला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बारामती शासकीय रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर ‘दादा’च्या आठवणी आहेत.
अंत्यदर्शन व अंत्यविधीचा कार्यक्रम…
अजित पवार यांच्या लोकप्रियतेमुळे मोठ्या जनसमुदायाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि पवार कुटुंबाने अंत्यदर्शन विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी चौक येथील मैदानात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंत्यविधीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
आज (बुधवार, २८ जानेवारी):
दुपारी ४.०० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी उपलब्ध
उद्या (गुरुवार, २९ जानेवारी):
सकाळी ९.०० वाजता अंत्ययात्रा प्रारंभ
अंत्ययात्रा मार्ग:
गदिमा सभागृह → विद्यानगरी चौक → भिगवण रोड सेवा रस्ता → विद्या प्रतिष्ठान अंतर्गत रस्ता → मराठी शाळा गेट → विद्या प्रतिष्ठान मैदान
सकाळी ११.०० वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (State Honours)
राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती…
अजित पवार यांच्या निधनामुळे देशभरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या विशेष विमानाने बारामतीत येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा…
महाराष्ट्र सरकारने अजित पवार यांच्या निधनानिमित्त २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले जाणार असून कोणतेही मनोरंजनात्मक किंवा अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.
Editer sunil thorat



