शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ राज्यातील ७.५ एचपीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज; ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ…

पुणे : जागतिक हवामान बदल आणि अनियमित पावसामुळे शेतकरी वर्गाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मार्च २०२४ अखेर राज्यात ४७ लाख ४१ हजार कृषीपंप ग्राहक असून, यापैकी ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान महावितरणला देण्यात येणार आहे.
या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून २०२४ मधील पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. शेतकऱ्यांवरील वीजबिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील ७.५ एचपी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णपणे मोफत वीजपुरवठा करण्यात येईल.
५ वर्षांसाठी योजना राबविणार
‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ ही योजना एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, तीन वर्षांनंतर तिचा आढावा घेण्यात येईल. योजना महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येते.
वीजबिल माफीसाठी शासनाचा आर्थिक भार
सध्या वीजदर सवलतीसाठी शासनाकडून ६,९८५ कोटी रुपये आणि वीज बिल माफीसाठी ७,७७५ कोटी रुपये, अशी एकूण १४,७६० कोटी रुपये वार्षिक रक्कम महावितरणकडे वर्ग केली जाणार आहे. तसेच, मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याच्या धोरणालाही चालना देण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतीसाठी स्थिर वीज उपलब्ध होईल.
महावितरण अधिकाऱ्यांची माहिती…
सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल म्हणाले,
“राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेनुसार पुणे जिल्ह्यातील ७.५ एचपीपर्यंतच्या २ लाख ८४ हजार १९८ शेतीपंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख २९ हजार ४८८ शेतीपंप आहेत.”
शेतकऱ्यांचा आनंद आणि समाधान
विकास किसन कापडी (जारकरवाडी, आंबेगाव) म्हणाले,
“आमचे ३ एचपी आणि ५ एचपीचे दोन शेतीपंप आहेत. आता वीजबिलाची चिंता संपली आहे. पूर्वी दर तीन महिन्याला बील भरण्यासाठी धडपड करावी लागायची. सरकारचे योजनेसाठी आभार.”
तर सुनिल अर्जुन करंडे (काठापूर बु., आंबेगाव) म्हणाले,
“माझे ५ एचपीचे कनेक्शन आहे. मागील वर्षभरात वीजबिल येत नाही. मी या योजनेबद्दल समाधानी आहे आणि सरकारचे आभार मानतो. दिवसा वीज पुरवठ्याचे प्रयत्नही स्वागतार्ह आहेत.”
Editer sunil thorat



