शेतकऱ्यांच्या पिकांना कोण जाळतंय? कदमवाकवस्तीतील ऊस जळीत प्रकरणामुळे खळबळ ; २४ तासांत दुसरी घटना…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी मोठी घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी लोणी काळभोर परिसरात ५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी (ता. २४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे ५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव संपत महादेव गुजर असे असून ते सुरतपट्टीलगत शेती करणारे कष्टकरी शेतकरी आहेत. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांतच ऊस तोडणीला येणार असल्याने या पिकावरच त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा अवलंबून होता. मात्र, एका क्षणात मेहनतीवर पाणी फेरले गेले.
अचानक आग, शेतकरी हतबल…
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुजर यांच्या ऊसाच्या क्षेत्राला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाणे व अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण अडीच एकर ऊस जळून खाक झाला होता. शेतात राखेचे ढीग आणि उद्ध्वस्त स्वप्नांचे चित्र पाहून शेतकरी गुजर अक्षरशः कोलमडून पडले.
अपघात की घातपात?
ऊसाला आग आपोआप लागली की कोणी लावली, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र, अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऊस जळीत झाल्याने घातपाताचा संशय अधिक गडद होत आहे. यापूर्वीही या भागात अशा घटना घडल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी
या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, तसेच आगीचे खरे कारण शोधून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संपत गुजर यांनी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आधीच कर्ज, वाढती उत्पादनखर्च आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे मेटाकुटीस आलेला असताना अशा आगीच्या घटना म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
प्रश्न अनुत्तरितच…
ऊस जळीत घटनांची चौकशी कोण करणार?
अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडे कोणती ठोस यंत्रणा आहे? नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत केव्हा मिळणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर परिसरातील शेतकरी असुरक्षितच राहणार, हे मात्र नक्की.
Editer sunil thorat




