मद्यप्रेमींना मोठा धक्का! महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये १३ ते १६ जानेवारी दरम्यान चार दिवस ‘ड्राय डे’…
मुंबई | पुणे | नागपूर | ठाणे | नाशिक | छत्रपती संभाजीनगर | कोल्हापूर

पुणे : महाराष्ट्रात होणाऱ्या २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात शांतता, सुव्यवस्था आणि मतदारांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी १३ जानेवारीपासून १६ जानेवारी २०२६ पर्यंत सलग चार दिवस दारू विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सर्व दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असून विविध राजकीय पक्षांचे नेते सभा, रोड शो आणि बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच दारूच्या सेवनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी आदेशानुसार, मंगळवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ड्राय डे लागू होणार असून १४ जानेवारीचा संपूर्ण दिवस, १५ जानेवारीचा मतदानाचा दिवस आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारू विक्री बंद राहणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत दारूची विक्री, साठवणूक तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
हा ड्राय डे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिका क्षेत्रांत लागू राहणार आहे. निवडणूक काळात पारदर्शकता राखण्यासाठी आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून या कालावधीत गस्त वाढवण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, गोंधळ, गैरप्रकार किंवा दंगलीसारख्या घटना रोखण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. दारू विक्रेत्यांना याबाबत आधीच पूर्वसूचना देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
निवडणुकीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, मद्यपानावर घालण्यात आलेली ही बंदी मतदार सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये येत्या चार दिवसांत दारूची दुकाने बंद राहणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat




