
लोणी काळभोर (ता. हवेली) : येथील बौद्ध वस्ती व मातंग वस्ती परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढती लोकसंख्या व वाढता पाण्याचा वापर यामुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसेवक, लोणी काळभोर ग्रामपंचायत यांना निवेदन देत शासकीय जागेत सार्वजनिक बोअरवेल घेण्याची मागणी करण्यात आली.
अर्जदार दिगंबर अर्जुन जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते संबंधित परिसरात कायमस्वरूपी वास्तव्यास असून गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या काळात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे. सध्या ग्रामपंचायतीमार्फत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत अपुरा ठरत आहे. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.
बौद्ध वस्ती व मातंग वस्तीतील नागरिकांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीकडे बोअरवेलसाठी अनेक वेळा अर्ज सादर केले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासकीय योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पाण्याची बोअरवेल मंजूर करून तातडीने काम हाती घ्यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे संचालक संजय भिमराव भालेराव, रिपब्लिकन भिमक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र जैनजागडे, शेतकरी नेते सुर्यकांत काळभोर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष नईम इनामदार उपस्थित होते. ग्रामसेवक गवारे यांनी निवेदन स्वीकारून विषयावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. परिसरातील नागरिकांचे लक्ष आता ग्रामपंचायतीच्या निर्णयाकडे लागले आहे.
Edited sunil thorat




