
पुणे (हवेली) : गावगाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.११) काढण्यात आली. यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे, यांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक आजपासूनच कामाला लागले आहेत. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काही जणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले.
सर्वसाधारण गटामध्ये असलेली गावे…
फुलगाव, वडगांव शिंदे, अहिरे, खानापुर, बकोरी, बिवरी, तुळापुर, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, बहुली, मालखेड, डोणजे, गोन्हे खुर्द, सोनापुर, शिरसवडी, बुर्केगाव, पेरणे, लोणीकंद, अष्टापुर, सांगरूण.
सर्वसाधारण महिला गटामध्ये असलेली गावे…
कल्याण, मांजरी खुर्द, घेरासिंहगड, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, तरडे, भवरापूर, उरुळी कांचन, खडकवाडी, आर्वी, गाऊडदरा, श्रीरामनगर, थेऊर, कोलवडी साष्टे, न्हावी सांडस, कुंजीरवाडी, आव्हाळवाडी, सांगवी सांडस, मांडवी बुद्रक व वढू खुर्द.
नागरिकांचा मागास प्रवर्ग गटामध्ये असलेली गावे…
निरगुडी, मांडवी खुर्द, शिंदवणे, सोरतापवाडी, गोहे बुद्रुक, भावडी, डोंगरगाव, खामगाव टेक, गोगलवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटामध्ये असलेली गावे…
वळती, वडकी, जांभळी, आंबी, पेठ, मणेरवाडी, शिवापूर, नायगाव, कोंढणपूर, कुडजे.
अनुसूचित जाती गटामध्ये असलेली गावे…
खामगाव मावळ, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, राहाटवडे, केसनंद.
अनुसूचित जाती महिला गटामध्ये असलेली गावे…
आगळंबे, खेड शिवापूर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, प्रयागधाम.
अनुसूचित जमाती गटामध्ये असलेली गाव…
वरदाडे
अनुसूचित जमाती महिला गटामध्ये असलेली गाव…
शिंदेवाडी
जनतेतून सरळ सरपंच पदाची निवड असल्याने हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीची उपस्थिती फारच कमी होती. अंदाजे दोनशेच्या आसपास नागरिक यावेळी उपस्थित होते. जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने निवडणूक लढवायला खुपच खर्च येतो. त्यामुळे इच्छुक आपोआपच कमी होतात अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरु होती. आपापल्या गावातील आरक्षण सोडत समजल्यानंतर मोर्चे बांधण्यासाठी आलेले गावगाड्याचे नेते मंडळी परतली.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



