एकेकाळी गाजवलं बॉलिवूड! ३०० हून अधिक चित्रपट करूनही झाला दारुण अंत; महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला…

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी कधी कोणाचं भाग्य उजळवते तर कधी एका क्षणातच अंधारात लोटते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ८० आणि ९० च्या दशकात आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे अभिनेता महेश आनंद यांचा शेवट अतिशय वेदनादायी झाला.
‘शहंशाह’, ‘हथियार’, ‘मुजरिम’, ‘तूफान’ अशा गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केलं. पडद्यावर त्यांची एक झलक जरी दिसली तरी सिनेरसिकांना दाद द्यावीशी वाटे. मात्र, वैयक्तिक आयुष्य आणि आर्थिक संकटांमुळे ते कायम चर्चेत राहिले.
५ लग्न, तरीही एकाकी शेवट…
महेश आनंद यांच्या लव्ह लाईफबद्दलही अनेकदा गॉसिप कॉलम रंगले. त्यांनी एकामागून एक पाच लग्नं केली. पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉय यांच्या बहिणी बरखा रॉयसोबत, तर दुसरं मिस इंडिया इंटरनॅशनल मारिया एरिका डिसूझाशी केलं. नंतर १९९२ मध्ये मधु मल्होत्रा, २००० मध्ये उषा बचानी आणि शेवटी एका रशियन महिलेशी विवाह केला. मात्र, कोणतंच नातं टिकू शकलं नाही.
शेवटच्या क्षणीही पैशांचा अभाव…
तब्बल ३०० चित्रपट केल्यानंतरही महेश आनंद यांच्या हाताला शेवटच्या काळात काम नव्हतं. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की पाणी विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा शेवटचा चित्रपट होता ‘रंगीला राजा’.
कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह…
एकेकाळचा हा यशस्वी अभिनेता वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह बराच वेळ पडून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. त्यांच्या फेसबुकवर काही मेसेज आढळले होते ज्यातून ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी आसुसले असल्याचं समजतं.
बॉलिवूडमधील एका यशस्वी पण दुर्दैवी कलाकाराचा हा शेवट ऐकून सिनेसृष्टी हादरली होती.
Editer sunil thorat




