
पुणे (हवेली) : काल देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना, आपल्या परिसरात स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला. एका सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्तीने फोरव्हीलर गाडीतून कचरा थेट रस्त्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “आपण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना नागरिक म्हणून आपली मूलभूत जबाबदारी विसरलो आहोत का?” असा सवाल निर्माण झाला आहे.
१५ दिवसांपासून सुरू आहे जनजागृती…
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या गावातील नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, दिपक काळभोर आणि सामाजिक संघटनांनी गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना आवाहन केले आहे. “सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, आपल्या घरी येणाऱ्या कचरा वेचकांना तो द्या. जर कचरा वेचक येत नसतील, तर थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमची समस्या सोडवू.” तरीदेखील काही नागरिक निर्लज्जपणे खुलेआम कचरा टाकत आहेत, ही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
हेतू अपमानाचा नाही, शिस्तीचा…
स्थानिक स्वच्छता मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, कोणाचाही अपमान किंवा मन दुखावणे हा त्यांचा हेतू नाही. गाव स्वच्छ ठेवणे, नागरिकांना शिस्त लावणे आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ला हातभार लावणे हेच उद्दिष्ट आहे.
नागरिकांसाठी आवाहन…
“कचरा फेकणे हा केवळ नियमभंग नसून, तो आपल्या गावाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा प्रकार आहे. स्वच्छता ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे,” असे आवाहन नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिपक काळभोर यांनी व स्वच्छता मोहिमेच्या स्वयंसेवकांनी केले.
Editer sunil thorat




