
पुणे : डिजिटल युगात तंत्रज्ञानाची झपाट्याने झालेली प्रगती न्यायव्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे करत आहे. परदेशी सर्व्हरवरून ई-पुरावे मिळवणे, क्रिप्टो व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, क्युआर कोड फसवणूक रोखणे आणि न्यायप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) योग्य वापर करणे या तातडीच्या गरजा आहेत. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांत वकिलांनी टेक्नो-सॅव्ही होणे अत्यावश्यक असल्याचे मत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे “आधुनिक काळातील कायदेशीर आव्हाने : वकील व कायदेतज्ज्ञांसमोरील शैक्षणिक दृष्टीकोन” या एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. डिकोस्टा प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या वेळी बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष अमोल उमराणीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोव्होस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. केतकी दळवी, डॉ. मोहिनी सुर्यवंशी, स्कूल ऑफ लॉचे प्रा. डॉ. गोविंद राजपाल आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डिकोस्टा म्हणाले, “ई-मेल गैरवापर, अनधिकृत संकेतस्थळांवरील अवैध विक्री, क्रिप्टो व केवायसीशी संबंधित गुन्हे, क्युआर कोड फसवणूक अशा गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक फसवणूक थोपवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी तर गरजेची आहेच; पण त्याहूनही वकील, पोलीस व विद्यार्थी यांनी सायबर फॉरेन्सिक्स व डिजिटल पुरावे मिळवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.” त्यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, याकडेही लक्ष वेधले.
प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, “एआय तंत्रज्ञान न्यायास मदत करेल; मात्र न्याय निवाड्याचा आत्मा मानवी विवेकातच आहे.”
कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान आवश्यक – डॉ. गणकर
डॉ. गणकर पुढे म्हणाल्या, “कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान व नैतिकता समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. एमआयटी एडीटी स्कूल ऑफ लॉने बीबीए एलएलबी, एलएलएम, एलएलबी यांसह पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि लेबर वेलफेअर डिप्लोमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फॉरेन्सिक व एआय टूल्स यांसारखे विषय समाविष्ट केले आहेत. हे अभ्यासक्रम एचआर मॅनेजर्स, आयटी कर्मचारी, डॉक्टर्स आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
वकिली पेशाचे उज्वल भविष्य…
चर्चासत्रात डॉ. केतकी चितळे यांनी विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “अलीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम गर्भाशय तयार झाल्याची माहिती आली आहे. यामुळे पुनरुत्पादनासाठी स्त्रियांची आवश्यकता कमी होऊ शकते. मात्र, यामधून अनेक कायदेशीर पेच निर्माण होणार आहेत. म्हणून भविष्यात वकिली पेशाची मागणी प्रचंड वाढेल.
दुसरे सत्र : सामाजिक बदल व घटनात्मक तत्त्वांचे संतुलन
दुसऱ्या सत्रात ‘सामाजिक बदलांसह घटनात्मक तत्त्वांचे संतुलन’ या विषयावर डॉ. नागेश कुमार, ॲड. विभाकर रामतीर्थकर, डॉ. दीप्ती लेले, ॲड. विश्वास खराबे, ॲड. योगेश पवार, ॲड. मंगेश खराबे आदी तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाज व भारतीय घटनेतील बदलांचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
Editer sunil thorat






