वाटेल ती किंमत मोजायला तयार, पण सामाजिक ऐक्य जपायलाच हवं – शरद पवारांचं मोठं वक्तव्य…

नाशिक : हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं.
आज (शनिवार) शरद पवार यांच्या हस्ते नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात आहे असं दिसतंय. सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. पण समाजामध्ये फूट पडू देणार नाही, सामाजिक ऐक्य जपायलाच हवं.”
शरद पवारांनी मांडला ऐतिहासिक संदर्भ…
यावेळी बोलताना त्यांनी दादासाहेब गायकवाड यांचा उल्लेख करत म्हटलं की, “बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे दादासाहेबांनी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारण आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाकडून दादासाहेबांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले.”
त्यांनी पुढे स्मरण केलं की, “तेव्हाचा काळ वेगळा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नाशिकचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करताना यशवंतराव चव्हाण यांना चीनच्या आक्रमणाच्या काळात देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळावी लागली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे सैन्यदलाचं मनोबल उंचावलं.”
काँग्रेस-आरपीआय युतीचा दाखला…
शरद पवार म्हणाले, “दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून पहिल्यांदा काँग्रेससोबत आरपीआयची युती झाली. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड या दोन्ही नेत्यांना दिलं पाहिजे.”
Editer sunil thorat



