कदमवाकवस्ती हद्दीत अतिवृष्टी-ढगफुटीचा कहर ; शेकडो कुटुंबांचे घरगुती साहित्य, धान्य पाण्यात, ग्रामपंचायतीकडून मदतकार्य वेगाने…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : रविवारी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाने कदमवाकवस्ती परिसरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले. कवडी माळवाडी, वाकवस्ती, कदम वस्ती, संभाजीनगर, स्वामी विवेकानंद नगर, राईलकर चौक, हायवे लगतची व्यवसायिक दुकाने, इंदिरानगर, घोरपडे वस्ती तसेच लेन क्रमांक ६ ते १० या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले.
अनेक कुटुंबांच्या घरातील रेशन, धान्य, कपडे, फर्निचर आणि मुलांचे शैक्षणिक साहित्य पाण्याखाली गेले. रात्रीच्या भीषण पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. या परिस्थितीत सर्व मा. सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामसेवक अमोल घोळवे तसेच स्थानिक नागरिकांनी तत्परतेने काम करत बाधितांना सुरक्षित स्थळी हलवले.
सकाळपासून ग्रामपंचायतीने अडकलेला कचरा काढून चेंबूर खुली करून पाणी वाहून जाण्यासाठी प्रयत्न केले. बाधित कुटुंबांच्या गैरसोयीची जाणीव ठेवून ग्रामपंचायती सोबत गावातील नागरिकांनी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली. काही कुटुंबांना पालखीतळ व विरंगळा केंद्रावर स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी, मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत बाधित कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले. गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांच्या सूचनेनुसार तृप्ती कोलते अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, मनीषा ज्ञानेश्वर कटके (विद्यमान आमदारांच्या पत्नी), मच्छिंद्र सातव पाटील व शिरीष शेलार (गटविकास अधिकारी) यांनी गावाला भेट देऊन मदत कार्यात सहकार्य केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी फोनवरून सतत परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी सांगितले की बाधित कुटुंबांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यात येत असून ग्रामपंचायत व प्रशासन एकत्रितपणे मदतकार्य करत आहे.
मा. चित्तरंजन गायकवाड – सरपंच, कदमवाकवस्ती
“गावावर आलेल्या या आपत्तीच्या काळात ग्रामपंचायत, प्रशासन व स्थानिक नागरिक एकत्र येऊन मदतकार्य सुरू केले आहे. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविणे, जेवण-निवाऱ्याची व्यवस्था करणे व पंचनामे पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
अमोल घोळवे – ग्रामविकास अधिकारी, कदमवाकवस्ती
“अतिवृष्टी-ढगफुटीमुळे शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मदतीने बाधितांना सुरक्षित स्थळी हलवून चहा-नाश्ता व निवाऱ्याची तातडीची सोय करण्यात आली आहे. पंचनामे सुरू असून बाधित कुटुंबांना शक्य ते सर्व सहकार्य दिले जाईल.”
Editer sunil thorat






