स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; महाराष्ट्र विकासाच्या आघाडीवर

मुंबई : भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण करून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाचे विषय मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील भारतीय सैन्याच्या शौर्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. या मोहिमेत भारतीय लष्कराने दहशतवादी व पाकिस्तानच्या लक्ष्यांवर अचूक कारवाई करून देशाची ताकद जगासमोर आणली.
आर्थिक विकासाच्या बाबतीत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था गेल्या दशकात ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचा या प्रवासात मोलाचा वाटा असून देशात येणाऱ्या ४० टक्के परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्येही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा गौरव त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करताना फडणवीस म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी मोफत वीज देण्यात येणार आहे. दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल जेथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल.” नदीजोड प्रकल्पांमुळे शेती व उद्योगांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सुरक्षा विषयांवर बोलताना त्यांनी गडचिरोली पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. माओवादी व नक्षलवाद्यांपासून गडचिरोली पूर्णपणे मुक्त झाल्याचे सांगत, येथे स्टील हब म्हणून विकासाची गती वाढत असल्याची माहिती दिली. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतर्गत वाढवण बंदर, पुणे, नागपूर, गडचिरोली, अमरावती विमानतळांचे आधुनिकीकरण आणि समृद्धी महामार्गासारख्या योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, १,००० हून अधिक वस्ती असलेल्या गावांमध्ये सिमेंट-काँक्रीट रस्ते बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या आदर्श मार्गावर चालत महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
Editer sunil thorat




