
पुणे : सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून दररोज सुमारे एक लाख भाविकांची गर्दी होऊ शकते, हे लक्षात घेऊन सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा)” अंतर्गत नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येत आहेत. जुना सभामंडप पूर्णतः उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडपाचे काम सध्या सुरू असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडी बांधकाम, बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्री ठेवण्यात आलेली आहे.
कामांचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि संभाव्य भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि महाशिवरात्रीचा कालावधी (दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६) वगळण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेचा सखोल आढावा घेतल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोठ्या आकाराचे दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे महाशिवरात्री कालावधीतही मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्या काळात बांधकाम करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा उभारून भाविकांना सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्यामुळे दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी पूर्णतः बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Editer sunil thorat



