मोठी बातमी! २०२६-२७ पासून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन ; ‘एआय’च्या मदतीने होणार तपासणी..

पुणे : राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका आता पारंपरिक पद्धतीऐवजी ऑनलाइन तपासल्या जाणार आहेत. चुकीच्या उत्तराला गुण देणे, अर्धवट उत्तराला पूर्ण गुण देणे, अक्षरातील अदलाबदल अशा त्रुटी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)ची मदत घेतली जाणार आहे. हा नवा पॅटर्न २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा प्रस्ताव असून तो शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
राज्यात सुमारे १५ हजार केंद्रांवर दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. सध्या परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका संकलित करून ठरावीक शाळांमध्ये जमा केल्या जातात. त्यानंतर त्या विषय शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. तपासणी झालेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर व चीफ मॉडरेटरकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत वेळ, श्रम व खर्च वाढतो तसेच गैरप्रकाराला वाव मिळण्याची शक्यता असते.
अशी असणार नवी पद्धत…
नव्या प्रणालीअंतर्गत परीक्षा संपल्यानंतर त्याच केंद्रावर उत्तरपत्रिकांचे तात्काळ ऑनलाइन स्कॅनिंग केले जाईल. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या प्रणालीवर अपलोड होतील. विषयानुसार शिक्षकांची माहिती संकलित करून संबंधित शिक्षकांच्या लॉगिनवर त्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध होतील.
शिक्षकांना घरी, शाळेत किंवा अन्य ठिकाणाहून मोबाईल, टॅब किंवा संगणकाच्या माध्यमातून तपासणी करता येणार आहे. एआय प्रणाली चुकीच्या उत्तराला गुण देणे, अर्धवट उत्तराला जादा गुण देणे यांसारख्या बाबी ओळखून तपासणी अधिक अचूक करण्यास मदत करणार आहे.
आधी कुठे राबवला पॅटर्न?
Madhya Pradesh राज्यात हा पॅटर्न प्रथम राबविण्यात आला. त्यानंतर Central Board of Secondary Education (सीबीएसई) नेही दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन तपासणी व एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education देखील पुढील शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत अमलात आणण्याच्या तयारीत आहे.
शासन स्तरावर अंतिम निर्णय…
“मध्यप्रदेश आणि सीबीएसईच्या धर्तीवर स्टेट बोर्डातही ऑनलाइन तपासणीचा विचार सुरू आहे. अंतिम निर्णय शासन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल,” अशी माहिती विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली.
या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणीतील पारदर्शकता वाढण्यासोबतच वेळ, खर्च आणि मनुष्यबळाची मोठी बचत होणार असल्याचे बोर्ड अधिकाऱ्यांचे मत आहे.
Editer sunil thorat



