गॅस गळतीमुळे दुर्दैवी घटना ; अन्न प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
कदमवाकवस्तीत भीषण स्फोट ; ‘अमित बिर्याणी’ हॉटेल आगीत खाक...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : हिंदुस्थान पेट्रोलियम समोरील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन संपूर्ण हॉटेल आगीत खाक झाले. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावरील संभाजीनगर, कदमवाक वस्ती (ता. हवेली) परिसरातील हे हॉटेल नेहमीप्रमाणे सुरू असताना रात्री किचनमध्ये गॅस गळती झाली. काही क्षणांतच मोठा स्फोट झाला आणि आगीने भीषण रूप धारण केले. हॉटेलमधील गिऱ्हाईक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बाहेर पळ काढला. आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या व्यावसायिकांनी दुकाने बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी हॉटेलमधील दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण हॉटेल ज्वाळांनी वेढले गेले.
कदमवाकवस्ती परिसरात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने हडपसर, वाघोली व वानवडी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली; परंतु तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य, फ्रीज, गॅस यंत्रणा व इतर सर्व मालमत्ता पूर्णतः जळून खाक झाली होती.
लोणी काळभोर पोलिसांनीही त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आगीच्या दिवशीच गॅस रिपेअरिंगचे काम झाले होते आणि सिलेंडरचा वॉशर बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून “तेरी भी चुप, मेरी भी चुप” अशी चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूर्व हवेली परिसरातील हॉटेल्सची नियमित तपासणी होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. सर्व हॉटेल्सचे फायर ऑडिट, गॅस लाईन तपासणी आणि व्यवसाय परवान्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोणी काळभोर–कदमवाक वस्ती परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्यास विलंब होतो. भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यासाठी या भागात कायमस्वरूपी अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या भीषण घटनेमुळे प्रशासनाच्या सज्जतेवर आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



