नदीपात्राचा हिस्सा वगळून उर्वरित जागेत कचरा प्रकल्प, नदीसुधार, गार्डन व ओपन जिम उभारणीचा निर्णय • एमआयटीचे अतिक्रमण हटविण्याची मागणी…
लोणी काळभोरमध्ये गट क्र. ११३ वर अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्प ; विशेष ग्रामसभेत ठराव सर्वानुमते मंजूर...

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११३ मधील १८ एकर जागेची शासकीय मोजणी करून तेथील नदीपात्राचा भाग वगळून उर्वरित जागेवर अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्प, नदीसुधार प्रकल्प, तसेच गार्डन आणि ओपन जिम उभारण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विद्यार्थी आंदोलनानंतर प्रकल्पाचा मार्ग मोकळा…
मुळा-मुठा नदीपात्रालगत अनेक वर्षांपासून जमा होत असलेला कचरा टाकण्याचा प्रश्न चिघळत होता. काही दिवसांपूर्वी या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे परिसर प्रदूषित झाला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. परिणामी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा न उचलल्याने अक्षरशः ढीग साचून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले.
ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने परिस्थितीवर मात करण्यासाठी वरील महत्वाचा ठराव संमत केला.
एमआयटीच्या अतिक्रमणाविरोधात कारवाईची मागणी…
ग्रामसभेत एमआयटी प्रशासनाने ओढ्यावर केलेले ९ मीटर अतिक्रमण आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी पीएमआरडीला सूचना द्याव्यात, असा ठराव मंजूर झाला.
तसेच शासनाने गट क्रमांक ३९ मधील लोणी काळभोर–थेऊर जोड रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणीही जोरदार करण्यात आली.
एमआयटी संस्थेने शासकीय परवानगीशिवाय मुळा-मुठा नदीत बांधलेला विश्वराज बंधारा हटवावा, हा ठराव देखील ग्रामसभेत एकमुखाने मंजूर झाला.
याशिवाय पाटबंधारे खात्याने ग्रामपंचायतीला बजावलेली चुकीची नोटीस याबद्दल निषेधही नोंदवण्यात आला.
ग्रामसभेत मान्यवरांची उपस्थिती…
ग्रामसभेत जिल्हा परिषद सदस्य शीतल कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, तसेच रमेश भोसले, संतोष भोसले, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठराव शासनाकडे; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार…
सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर यांनी सांगितले की, सर्व ठराव तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्वरित कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
२ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री अंबरनाथ देवाच्या वार्षिक उत्सवात कचऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून एका एजन्सीमार्फत साचलेला कचरा तात्पुरता उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायमस्वरूपी उपाय म्हणून आमदार माऊली कटके यांचेकडे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व नायगाव या गावांसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन त्यावर मोठा कचरा प्रकल्प उभारण्याची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Editer sunil thorat





