
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : स्वच्छतेच्या नावाखाली सुरू असलेली कचरा व्यवस्थापनाची ढिसाळ पद्धत आता थेट मुलांच्या आरोग्यावर घाला घालत असल्याचा संतापजनक प्रकार कवडीपाठ (स्टार सिटी) येथे शनिवारी दि. २५ रोजी उघडकीस आला आहे. येथे मुलांच्या क्रिकेटच्या मैदानावरच कचऱ्याचे ढीग साचवले जात असून, प्रशासन आणि संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.
होम-टू-होम कचरा संकलनासाठी नेमलेले कर्मचारी घराघरातून ओला व सुका कचरा गोळा करतात; मात्र नियमानुसार प्रक्रिया केंद्रात नेण्याऐवजी तो थेट सोसायटीतील क्रिकेट मैदानावर टाकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मैदान अक्षरशः कचरा डेपोमध्ये बदलले असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या परिस्थितीमुळे येथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, “आम्ही काय करणार?” अशी उडवाउडवीची आणि उद्धट प्रतिक्रिया देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संताप आणखी वाढला असून, संबंधित यंत्रणा नागरिकांशी उर्मटपणे वागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रशांत कळसकर, सागर जगदाळे, प्रशांत हरगुडे, सोमनाथ पुणेकर, विकास थोरात, सुतार, सुर्यवंशी यांसह अनेक रहिवाशांनी पर्यायी व्यवस्था सुचवूनही “हम करो सो कायदा” या भूमिकेत कामकाज सुरू असल्याची तीव्र टीका करण्यात आली आहे. नागरिकांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर कचऱ्याचे अतिक्रमण झाल्याने मुलांना खेळण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित जागाच उरलेली नाही. यामुळे पालकांमध्येही चिंता वाढली असून, तात्काळ कचरा हटवून मैदान पूर्ववत न करावे असे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीचे संचालक विजयेन्द्र चाबुकस्वार यांनी “लवकरच कचरा हटवून मैदान मोकळे केले जाईल” अशी प्रतिक्रिया दिली असली, तरी प्रत्यक्षात कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वच्छ भारतच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील घाण—यातील तफावत आता स्पष्टपणे समोर आली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Editer sunil thorat



