
लोणी काळभोर (ता. हवेली): हिवताप (मलेरिया) या किटकजन्य आजाराविरुद्ध प्रभावी लढा उभारण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नसून नागरिकांची जागरूकता, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. वर्ष २०३० पर्यंत देशाला हिवतापमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अर्चना पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना हिवताप कसा होतो, त्याची लक्षणे, निदान व उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी घराभोवती साचलेले पाणी नष्ट करणे, पाण्याची टाकी झाकून ठेवणे, स्वच्छता राखणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप आल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी गाव परिसर व आठवडी बाजारातून जनजागृती रॅली काढली. या रॅलीत घोषणाबाजीद्वारे “डासमुक्त परिसर – हिवतापमुक्त समाज” असा संदेश देण्यात आला. नागरिकांमध्ये पत्रके वाटप करून किटकजन्य आजारांविषयी माहिती पोहोचविण्यात आली.
कार्यक्रमात संगीता रोकडे, अनुजा माळी, सारिका भिसे, आरोग्य सहाय्यक अनिल पोळ, समीर पटेल, समीर वाबळे, आदित्य नुले, अमोल चोगले तसेच आशा स्वयंसेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हिवतापाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat



