आदेश आला! पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी; कुठे-कुठे जाहीर?

मुंबई : राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई व उपनगरांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत, लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि गाड्याही उशिराने धावत आहेत.
या पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने पुढील 48 तास मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, शाळांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कुठे-कुठे शाळा बंद?…
मुंबई : महापालिका परिक्षेत्रातील सर्व खासगी, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर.
ठाणे महानगरपालिका हद्दीत : सर्व शाळांना सुट्टी.
कल्याण-डोंबिवली : मुसळधार पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश.
पालघर जिल्हा : सर्व शाळा बंद ठेवण्याची प्रशासनाची घोषणा.
मीरा-भाईंदर : हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य…
पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले आहे. वाहतूक विस्कळीत झाली असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत जाणे धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित निर्णय घेतला जाईल. जर मुसळधार पावसाचा इशारा असेल तर शाळांना सुट्टी दिली जाईल, अन्यथा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. आता मुसळधार पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालक व नागरिकांना आवाहन…
प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, मुलांना अनावश्यकपणे बाहेर पाठवू नये. तसेच पावसामुळे जलमय झालेल्या भागांपासून दूर राहावे. हवामान विभागाने दिलेल्या सूचना व प्रशासनाचे आदेश पाळून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण परिस्थिती पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर झाली असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पुढील दिवसांतही असेच निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat




