पुणे : विशिष्ट खाणं हे विशिष्ट जातधर्माशी जोडून त्याविरोधात प्रचार केला जातो. त्यातून शुद्ध खाणं आणि शाकाहार याचा प्रचारही केला जातो. मात्र खानपान ही मानवाची संस्कृती आहे, संस्कृती प्रवाही होती, आहे आणि पुढेही राहील, ती प्रवाही असणं हे मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.
आज बहुराष्ट्रीय कंपन्या भुकेचा धंदा करून बी. टी. बियाणांचा व्यवसाय करत असून त्या जे ताटात वाढतील ते (विष) खावं लागणार आहे, हा धोका ओळखून वेळीच जागं होत खानपान ही संस्कृती टिकवून ठेवणं आपल्याच हातात आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, फिल्म मेकर सोहेल हाश्मी यांनी केले. लोकायत, ज्ञानभरती, अलर्ट आणि राजीव गांधी स्मारक निधी आयोजित भारत एक खोज व्याख्यानमालेत दुसरे व्याख्यान भारत के स्वाद अंतर्गत बोलत होते.
ते बोलताना पुढं म्हणाले की उत्तर भारतीयांचं खाणं म्हणजे भारतीय खाणं हे पसरवलं जात आहे, पण काय तामिळनाडू, केरळ, ईशान्यपूर्वीकडील राज्य ही भारतीय नाहीत? का त्यांचं खाणं भारतीय खाणं नाही? या प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागेल. ईशान्यपूर्वेकडील राज्यांचं खाणं चायनीज म्हणून विकलं जात आहे. कोणत्याही भाज्या-पालेभाज्या आणि हाडं खाता येतील अशी निसर्गाने मानवाच्या दातांची रचना केलेली आहे, कारण माणूस मूलतः मांसाहार करत होता. शुद्ध शाकाहार असं काही नाही. पनीर, तूप यासारखे पदार्थ प्राणिज पदार्थ आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज प्रश्न शाकाहार का मांसाहार हा नसून बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या देशातली खाण्यातली विविधता समूळ नष्ट करून बी.टी. बियाणांचा धंदा करत आहेत, ज्यामुळे खाण्यातली विविधता नष्ट होण्याबरोबर शेतकरी देशोधडीला लागत आहे, आपल्या ताटात विष वाढलं जात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच मानवाची म्हणून असलेली खाण्यापिण्यातली विविधता संस्कृती टिकवता येईल.
व्याख्यानमालेमागचा उद्देश असणारं प्रास्ताविक लोकायतचे समन्वयक नीरज जैन यांनी मांडलं तर सूत्रसंचालन रुषल हिना यांनी केलं. यावेळी ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाला उपस्थितांनी केकचा आस्वाद घेतला.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा