ऊरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण व खंडणी प्रकरण उघड…
४८ तासांत चार आरोपी जेरबंद; १५.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

तुळशीराम घुसाळकर
ऊरुळी कांचन (ता. हवेली) : ऊरुळी कांचन परिसरातील एका डॉक्टरचे अपहरण करून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलीस स्टेशनला यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इरटीगा कार व खंडणीची रोकड असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ०९/२०२६ बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२), ११५(२), ११७(२), ३५१(३), ३०८(२), ३०८(३), ३(५) अन्वये दि. १४ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरणाची थरारक घटना…
फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय – डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे दि. १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता सुमारास सोलापूर-पुणे महामार्गाने ऊरुळी कांचनहून कुंजीरवाडी येथे जात असताना इनामदार वस्ती परिसरात त्यांच्या कारसमोर पांढऱ्या रंगाची इरटीगा कार आडवी लावण्यात आली. इरटीगा कारमधील चार अनोळखी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांचे अपहरण केले व त्यांना मारहाण करत शिंदवणे बाजूकडे नेले.
आरोपींनी सुरुवातीला ४ लाख रुपये खंडणी घेऊन डॉक्टरांना चौफुला येथे सोडले. मात्र त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी डॉक्टरांनी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी उर्वरित रक्कम दिली. एकूण १९ लाख रुपये खंडणी आरोपींनी उकळली.
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार…
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलीस स्टेशनची दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान फिर्यादी डॉक्टरांच्या ड्रायव्हरवर संशय बळावला. चौकशीत राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२, रा. अनंतपूर, पैठण, जि. छ. संभाजीनगर) याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
त्याच्या कबुलीनंतर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील आरोपींना अटक करण्यात आली. संतोष सोमनाथ बनकर (वय ३६)
दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४)
सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३०)
सर्व आरोपी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
मुद्देमाल जप्त; पोलीस कोठडी मंजूर…
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इरटीगा कार (किंमत अंदाजे ८ लाख रुपये) तसेच खंडणीची रोकड ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. सचिन वांगडे, सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदारांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे, ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन करत आहेत.
Editer sunil thorat



