
पुणे (हवेली) : परिसरात समाधानकारक पाऊस व्हावा म्हणून वरुणराजाची प्रार्थना करत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने आज पारंपरिक वनभोजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही भक्तीभावात पार पडली.
ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची पालखी पारंपरिक रीतीने जुन्या मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात आली. पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण, विविध संतांचे अभंग, आणि आबालवृद्धांची भक्तीमय उपस्थिती यामुळे सुमारे सात किलोमीटरचा प्रवास अधिकच भावपूर्ण झाला.
रामदरा येथील राममंदिरात आरती आणि डोंगरावरील गोवर्धन पर्वताची पूजा झाली. यानंतर महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गरम भात, आमटी, शिरा, जिलेबी आणि लाडूंबरोबरच भाविकांनी आपापल्या घरातून आणलेल्या पुरणपोळ्यांचाही एकमेकांना आग्रह केला.
परतीच्या मार्गावर अंबरनाथ, महादेव, विठ्ठल आणि मारुती मंदिरात आरत्या झाल्या. अखेरीस पालखी जुन्या मंदिरात पोहोचताच आरती झाली आणि वनभोजन उत्सवाची सांगता करण्यात आली.
आज दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. रिमझिम पावसात चिंब भिजत भाविकांनी भक्तिरसात न्हाऊन निघाले.
Editer Sunil thorat







