
कदमवाकवस्ती (ता.हवेली) : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते थेऊर फाट्या दरम्यान दररोजची वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत करत आहे. वाहतूक पोलिसांचा निष्क्रियपणा, पठाणी वसुली आणि महामार्गालगतची अनियंत्रित मंगल कार्यालये हे या कोंडीचे प्रमुख कारण बनले आहेत. नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा, रुग्णवाहिकांतील अडकलेले रुग्ण आणि पोलिसांच्या नाकर्तेपणाने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी हडपसर ते लोणी काळभोर दरम्यान तब्बल सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका या जाममध्ये अडकल्या. दोन ते तीन तास नागरिकांना हाल सोसावे लागले, तरीही वाहतूक पोलिस मात्र त्या ठिकाणी गायब असल्याचे चित्र दिसून येत होते.
“वाहतूक नाही, सगळं सुरळीत” – वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बेजबाबदार दावा…
वाहतूक कोंडीबाबत विचारले असता, पुणे वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने “कोठेही ट्रॅफिक जाम नाही, दावा खोटा” असा बेजबाबदार प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांचा त्रास प्रत्यक्ष पाहूनही प्रशासनाचे हे दुर्लक्ष संतापजनक आहे.
वसुलीवर भर, नियमांची पायमल्ली का?
हडपसर गाडीतळ, १५ नंबर चौक, शेवाळे वाडी, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर, थेऊरफाटा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची पठाणी वसुली उघडपणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना लक्ष्य करून “मोबाईल मध्ये फोटो काढा, दंड लावा” हे नवे तंत्र राबवले जात आहे. या अवाजवी दंडामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आर्थिक झळ व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
“गुंडगिरीवर सर्जिकल स्ट्राईक ठीक, पण वाहतूक पोलिसांवरही गरज!”
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडगिरीविरोधात सर्जिकल स्ट्राईक जाहीर केला असला, तरी पूर्व हवेलीतील नागरिकांचा प्रश्न वेगळाच आहे — वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि भ्रष्टाचारावरही सर्जिकल स्ट्राईक होणार का? अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Vip नंबर, व्यावसायिकांचे वाहन कुणी अडवणार?
लोणी स्टेशन चौक, ज्वेलर्स व हॉटेल्स परिसरात महामार्गावरच वाहन पार्किंग सुरू असते. पोलिस मात्र मौन बाळगून बघ्याची भूमिका घेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
‘सातच्या आत सुखरूप घरात’ – वाहतूक पोलिसांचे नवीन धोरण
सकाळी नऊला सेल्फी पाठवून अनेक पोलिस कर्मचारी ड्युटीवरून गायब होतात. दुपारी जेवणानंतर बऱ्याच वेळा ठिकाणावर अनुपस्थित थेट सायंकाळी चार वाजता हजर राहतात. संध्याकाळी वाहतूक सर्वाधिक असतानाही सातच्या आत सर्व पोलिस गायब! नागरिकांना मात्र दोन ते तीन तासांच्या जाममध्ये अडकून राहावे लागते.
नागरिकांची मागणी – “नाकर्त्या, वसुलीप्रेमी वाहतूक पोलिसांवर कारवाई करा!”
पुणे-सोलापूर महामार्गावरच्या दैनंदिन कोंडीस जबाबदार असलेल्या वाहतूक पोलिसांवर तातडीने कारवाई करून शिस्त आणावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. वाहतूक नियमनावर लक्ष न देता, वसुली आणि सुट्ट्यांच्या आड वाहतूक ठप्प ठेवणाऱ्या पोलिसांवर आता कठोर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची वेळ आली आहे.
Editer Sunil thorat



