तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी ; सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ…

मुंबई : समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असून, संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
मंत्रालयात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित आढावा बैठकीत मिसाळ यांनी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल विभागांचे अधिकारी तसेच तृतीयपंथी संरक्षण व कल्याण महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, “तृतीयपंथीयांनाही समाजात समान वागणूक मिळावी. आरोग्य, उच्च शिक्षण व व्यवसायाचा समान हक्क त्यांना मिळावा. प्रत्येक योजनेचा लाभ पात्रतेनुसार मिळणे आवश्यक आहे. शिक्षण व शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये अर्जावर तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून द्यावा.”
यासाठी जिल्हानिहाय सर्वेक्षण, समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक, जिल्हा व राज्यस्तरीय तक्रार समित्या स्थापन करण्याबाबतही त्यांनी सूचनाही दिल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी नवीन योजना, धोरणांचा आढावा, स्वतंत्र कक्ष, स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत 4783 तृतीयपंथीयांना ओळखपत्रे जारी करण्यात आली असून, 3901 आधार कार्डे आणि 1240 आयुष कार्डे वितरित झाली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच ही कार्डे देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधांसाठी आरोग्य मंडळामार्फत समुपदेशन आणि विशेष योजना तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या राज्यातील 68 तृतीयपंथी उच्च शिक्षण घेत असून, अधिकाधिक तृतीयपंथी शिक्षणाकडे वळावेत यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे माधूरी मिसाळ यांनी नमूद केले. तसेच विदेशी शिष्यवृत्ती योजनांचा तृतीयपंथीयांना लाभ मिळावा यासाठीही पावले उचलण्यात येतील.
मुंबईसह राज्यभर विभागीय कार्यालये स्थापन करून रोजगार व प्रशिक्षणासंबंधी योजना गतीने राबविण्याचे निर्देशही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.
Editer sunil thorat



