
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने येत नसून, प्रत्यक्षात तीच माणसाचे संरक्षण करते. वाहतूक सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात आहे, हे तरुणांनी समजून घेऊन सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ–५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात पोलीस वर्धापन दिन व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व वाहतूक जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठ, हडपसर वाहतूक विभाग आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालिका डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी स्वयंशिस्त ही यशस्वी व सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ३६० अंश दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. सर्वांगीण विकासासाठी स्वयंशिस्त आवश्यक असून, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत विद्यापीठातील शिस्तीचे कौतुक केले. ही शिस्त आध्यात्मिक पायावर उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी रस्ते अपघातांची कारणे, प्रतिबंधक उपाय आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कम्युनिटी पोलिसिंगचे महत्त्व स्पष्ट केले. अंतर्गत सुरक्षेसाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून, तरुणांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस कार्यपद्धती समजून घ्यावी तसेच वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी आई-वडील हे पहिले गुरू, शिक्षक हे दुसरे गुरू असल्याचे सांगितले. मात्र एखाद्याचे वर्तन या दोघांच्या नियंत्रणाबाहेर गेले, तर तिसरे गुरू म्हणजे पोलीस हस्तक्षेप करतात. या तिसऱ्या गुरूच्या सान्निध्यात आला की शिष्य नक्कीच सुधारतो, अशी कोटी करताच सभागृहात एकच हशा पिकला. कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रतिभा जगताप यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Editer sunil thorat





