
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि वडकी जिल्हा परिषद गटातून प्रमुख राजकीय पक्षांनी एकामागोमाग उमेदवारी जाहीर करताच या गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी निश्चित होताच निवडणुकीची खरी लढत आता थेट भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले असून, अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीमुळे ही लढत अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या निवडणुकीत कोणतीही युती किंवा आघाडी न करता सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी गटात चौरंगी लढत अटळ मानली जात आहे. त्यामुळे मतदारांसमोर पर्यायांची संख्या वाढली असून, पक्षीय समीकरणांपेक्षा उमेदवारांची प्रतिमा, स्थानिक कामगिरी आणि विकासाचा अजेंडा निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या गटात तिकीटासाठी इच्छुक असलेल्या परंतु संधी न मिळालेल्या उमेदवारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास या गटातील मतविभागणी निश्चित असून, त्यामुळे प्रमुख पक्षांचे विजयाचे गणित पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकांचा अनुभव पाहता, अपक्ष उमेदवार हे याच गटात अनेक वेळा ‘किंगमेकर’ ठरल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनाही या जिल्हा परिषद, पंचायत समिती आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत. संघटनात्मक बळ, स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे, सत्ताधारी पातळीवरील प्रभाव तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार या मुद्द्यांवर या पक्षांचा भर राहणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक प्रश्न, ग्रामविकासाची कामे, सामाजिक समतोल आणि अनुभवी नेतृत्वाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे.
या निवडणुकीत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, रोजगाराच्या संधी आणि ग्रामविकासाच्या अपूर्ण कामांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. शहरीकरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोणी काळभोर व परिसरातील वाढती लोकसंख्या, मूलभूत सुविधांचा ताण आणि प्रशासकीय दुर्लक्ष हे मुद्दे मतदारांमध्ये तीव्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
एकूणच, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि वडकी या परिसरात यावेळी केवळ पक्षीय लढत न होता व्यक्तिमत्त्व, कामगिरी आणि विश्वासार्हतेची कसोटी लागणार आहे. विकासाचा ठोस आराखडा मांडणारा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार मतदारांच्या पसंतीस उतरेल, असे संकेत सध्या दिसत आहेत. अखेर जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात कौल देणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार असले तरी, सध्या मात्र या गटात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
Editer sunil thorat



