
उरुळी कांचन : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १२.०० या कालावधीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हा रूट मार्च शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.
सदर रूट मार्च उरुळी कांचन पीएमटी चौक येथून सुरू होऊन आश्रम रोड, जय मल्हार रोड, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, तळवाडी चौक मार्गे शेवटी पुन्हा पीएमटी चौकपर्यंत पार पडून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. रूट मार्चदरम्यान पोलीस दलाने प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांमध्ये उपस्थिती दर्शवली.
या रूट मार्चमध्ये एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक तसेच सुमारे ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
रूट मार्चदरम्यान नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून निवडणूक काळात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अप्रत्यक्षपणे देण्यात आला. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च यशस्वीरीत्या पार पडला. निवडणूक कालावधीत अशाच प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



