जमिनीच्या वादातून भवरापूर येथे तरुण शेतकऱ्याचा खून ; दोन आरोपी ताब्यात…

उरुळी कांचन (ता. हवेली) : जुन्या जमिनीच्या वादातून आणि सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून भवरापूर येथे ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा कारने धडक देत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २ मार्च २०२६) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मृत तरुणाचे नाव महेश लक्ष्मण साठे (वय ३२, रा. भवरापूर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. याबाबत लक्ष्मण सोपान साठे (वय ५८, व्यवसाय-शेती, रा. भवरापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन गट क्र. १०४ संदर्भातील जुन्या वादातून तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून अभिषेक साठे याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) व त्याचा साथीदार गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. आष्टापूर, ता. हवेली) यांनी संगनमताने महेश साठे यांचा जीव घेण्याचा कट रचला.
घटनेच्या वेळी महेश साठे हे त्यांच्या हिरो होंडा पॅशन (क्र. MH12CJ9551) मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी हुंडाई कंपनीची आय-२० (क्र. MH12QY7888) कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महेश साठे यांचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा र. नं. ५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपघातासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे, तर गोकुळ कोकरे याचा पूर्वइतिहास नसल्याचे समजते. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत असून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे भवरापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
Editer sunil thorat



