उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे शिव-भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरून आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उत्साहाच्या भरात आणि काही तांत्रिक कारणांमुळे शिवसैनिक व भीम सैनिकांवर दाखल झालेले गुन्हे ‘विशेष बाब’ म्हणून तत्काळ मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष नम्रता कांबळे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार माऊली कटके, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे, लोचन शिवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नम्रता कांबळे म्हणाल्या, “शिवजयंती आणि भीमजयंतीसारखे प्रेरणादायी उत्सव साजरे करताना अनेक तरुण कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल झाले आहेत. या तरुणांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र, या प्रकरणांमुळे त्यांच्या भवितव्यावर आणि विशेषतः सरकारी नोकरीच्या संधींवर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने यापूर्वी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांच्या धर्तीवर हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.”
उपस्थित आमदारांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवत, कार्यकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या निवेदनामुळे हवेली तालुका आणि पुणे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Editer sunil thorat



