ग्रामपंचायतीला नोटीस देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न? नागरिकांचा पाटबंधारे प्रशासनावर गंभीर आरोप… वाचा सविस्तर…
पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी” ; लोणी काळभोर ग्रामस्थ...
लोणी काळभोर (ता. हवेली) : मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून पर्यावरणाची हानी केल्याचा गंभीर ठपका ठेवत पाटबंधारे विभागाने १६ मार्च रोजी लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नदीपात्रात कचऱ्याचे ढीग ; जळल्याचे प्रकारही उघड…
पाटबंधारे विभागाच्या पाहणीत नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर घनकचरा टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्लास्टिक, बांधकामातील अवशेष, घरगुती कचरा यामुळे नदीपात्र अक्षरशः कचऱ्याचे डेपो बनले आहे. काही ठिकाणी हा कचरा जाळण्याचे प्रकारही आढळून आले असून त्यामुळे परिसरातील हवा अधिक प्रदूषित होत आहे.
हवा-पाण्याचे प्रदूषण वाढले; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम…
नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली असून दुर्गंधी व प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्वचारोग, श्वसनाचे आजार आणि पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ; पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका…
अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, नदीपात्रातील कचरा नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करत आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळला जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तसेच हा कचरा पुढे वाहून जाऊन संपूर्ण नदी परिसंस्थेलाच धोका पोहोचू शकतो.
“तात्काळ कचरा टाकणे थांबवा”; वैज्ञानिक व्यवस्थापनाचे आदेश…
पाटबंधारे विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना तात्काळ कचरा टाकणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशांचे पालन न केल्यास सिंचन कायदा, प्रदूषण नियंत्रण नियम आणि धरण सुरक्षा अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संरक्षित नदीपात्र क्षेत्रात अतिक्रमण ; भूमिअभिलेख विभागाचा अहवाल…
भूमिअभिलेख विभागाच्या स्वतंत्र सर्वेक्षणात संबंधित जागा ही संरक्षित नदीपात्र क्षेत्रात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येथे कचरा टाकणे किंवा कोणतेही अतिक्रमण करणे बेकायदेशीर ठरत आहे. हा अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात आला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
लोणी काळभोर नागरिकांचा सवाल – “आतापर्यंत पाटबंधारे प्रशासन झोपेत होते का?”
या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “अनेक वर्षांपासून नदीपात्रात कचरा टाकला जात असताना संबंधित यंत्रणा काय करत होती?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अतिक्रमणांवरही कारवाईची मागणी ; दुहेरी निकष नको…
परिसरातील काही शैक्षणिक संस्था व प्रकल्पांकडून झालेल्या कथित अतिक्रमणांवरही कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. “ग्रामपंचायतींवर कारवाई होत असेल, तर इतरांनाही कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे,” अशी भूमिका लोणी काळभोर नागरिकांनी घेतली आहे.
अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी ; चौकशीची गरज…
या संपूर्ण प्रकरणात पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच निष्काळजीपणा झाल्याचा आरोप होत आहे.
कारवाईपुरते मर्यादित राहणार की खरे बदल घडणार?
एकीकडे पर्यावरण रक्षणाचे धोरण राबवले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात नदीपात्र कचऱ्याने भरले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता ही कारवाई केवळ नोटीसपुरती मर्यादित राहते की प्रत्यक्षात जबाबदारांवर कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



