
हवेली : उरुळी कांचन परिसरात सुरू असलेल्या अवैध रिक्षा वाहतुकीविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीला प्रशासनाकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, उरुळी कांचन परिसरातील काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन, अरेरावीची भाषा आणि क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ९ ते १० प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत दि. १५ जुलै २०२५ रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पुराव्यासह लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागविण्यात आली असता, हडपसर ते उरुळी कांचन मार्गावर दि. २९ मे २०२५ ते ५ जून २०२५ दरम्यान अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीही दंडात्मक कारवाई झाल्याची नोंद अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून लेखी कळविण्यात आले. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुढे दि. ८ जानेवारी २०२६ रोजी कारवाईचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला असता, उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांचेच म्हणणे नोंदविण्यात आले असून वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनीच संबंधित अधिकाऱ्यांची पाठराखण केल्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला.
या प्रकरणाचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असतानाही तब्बल नऊ महिने कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाला पुन्हा निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाला जावक क्रमांक १८२३/२०२६ देऊन अर्ज दप्तरी जमा केल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कारवाईचा अभाव कायम असल्याची टीका करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर दि. १६ मार्च २०२६ रोजी पुन्हा पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तरीही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष विजय विठ्ठल सकट यांनी दिली.
आंदोलकांनी हडपसर वाहतूक विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तसेच लोणी काळभोर वाहतूक विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रलंबित प्रश्नाला न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले असून, येत्या आठ दिवसांत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच हडपसर ते उरुळी कांचन मार्गावरील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील व प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कारवाई न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विजय सकट यांनी दिला. या आंदोलनात लहुजी शक्ती सेना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Editer sunil thorat



