
डाँ गजानन टिंगरे
पुणे : राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, शहरी व ग्रामीण भागातील २०११ पर्यंतची १५०० चौ. फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्वतःची जागा नसल्याने घरकुल योजनांचा लाभ घेऊ न शकलेल्या गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच या निर्णयामुळे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा महसूल वाढून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात शेतीसंदर्भातील सर्वाधिक वाद पानंद रस्ते अडवल्यामुळे निर्माण होत होते. यावर शासनाने कठोर निर्णय घेतला असून, पानंद रस्ता अडवल्यास तहसीलदारांनी सात दिवसांच्या आत पाहणी करून कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, रस्ता अडवणाऱ्या संबंधित व्यक्तीचे सर्व शासकीय लाभ बंद करण्यात येणार असून त्याचा फार्मर आयडी देखील रद्द करण्यात येणार आहे.
या दोन्ही ऐतिहासिक निर्णयांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ओबीसी मोर्चा, पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दौंडचे आमदार राहुल कूल, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, पांडुरंग कचरे, आकाश कांबळे, तेजस देवकाते, अविनाश मोटे, संदीप आदलींग, पांडुरंग सुळ यांच्यासह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
Editer sunil thorat



