भाड्याच्या थकबाकीमुळे ‘आस्क’ वृद्धाश्रम संकटात ; १५ बेवारस आजी-आजोबांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर…

हवेली (पुणे) : समाजातील पूर्णपणे बेवारस, मनोरुग्ण, आजारी आणि मरणासन्न अवस्थेत जीवन जगणाऱ्या वृद्धांना आधार देणाऱ्या “आस्क वृद्धाश्रम व अनाथाश्रम” समोर सध्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून इमारतीचे भाडे थकले असून आता घरमालकाकडून थकबाकी तात्काळ भरण्याचा किंवा जागा रिकामी करण्याचा इशारा देण्यात येत आहे. परिणामी, या आश्रमात आश्रय घेतलेल्या १५ निराधार आजी-आजोबांच्या डोक्यावरचे छत कधीही हिरावले जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे.
संस्थापक संचालक दादासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आश्रमाची खासियत म्हणजे येथे केवळ अशा वृद्धांना आसरा दिला जातो जे पूर्णपणे बेवारस आहेत—ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत किंवा ज्यांना कुटुंबाने सोडून दिले आहे. अनेक वृद्ध हे रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, फुटपाथवर अत्यंत दयनीय अवस्थेत सापडतात. काहींना मानसिक आजार आहेत, काही गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, तर काहींना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. अशा सर्वांना आश्रमात आणून त्यांचे राहणे, जेवण, कपडे, औषधोपचार आणि देखभाल पूर्णपणे मोफत केली जाते.
“आम्ही कधीही पैशासाठी नातेवाईकांचे वृद्ध घेत नाही. केवळ ज्यांना कोणीच नाही अशांनाच आम्ही आश्रय देतो,” असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मात्र, या सेवाभावी कामासाठी लागणारा खर्च मोठा असून तो पूर्णपणे देणगीवर अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांत आर्थिक मदत कमी झाल्यामुळे आश्रमाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या आश्रम ज्या इमारतीत सुरू आहे ती भाडेतत्त्वावर असून दरमहा २५ हजार रुपये भाडे द्यावे लागते. आर्थिक तुटवड्यामुळे हे भाडे मागील आठ महिन्यांपासून थकले आहे. परिणामी, ही थकबाकी आता जवळपास दोन लाख रुपयांवर पोहोचली आहे. घरमालकाकडून वारंवार भाडे भरण्याचा तगादा लावला जात असून “भाडे तात्काळ भरा, अन्यथा जागा खाली करा, आम्हाला दुसरे भाडेकरू मिळाले आहेत,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या परिस्थितीत आश्रम प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे—जागा खाली करायची झाली तर या १५ बेवारस वृद्धांना घेऊन जायचे कुठे? त्यांचा पुढील सांभाळ कसा करायचा? “इमारत आम्ही कधी ना कधी खाली करू शकतो, पण या आजी-आजोबांना रस्त्यावर सोडणे आमच्या मनाला मान्य नाही. त्यांचे आयुष्य आधीच दुःखाने भरलेले आहे, आता त्यांना पुन्हा बेघर करणे म्हणजे अन्यायच ठरेल,” असे भावनिक शब्दांत गायकवाड यांनी आपली व्यथा मांडली.
या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती, सामाजिक संस्था आणि नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. “या निराधार वृद्धांचे जीवनही तितकेच मौल्यवान आहे. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार, अन्न आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी समाजाने पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी संस्थापक संचालक दादासाहेब गायकवाड (मो. 9823105610) यांच्याशी संपर्क साधावा किंवा GPay/PhonePe क्रमांक 9823505258 वर मदत पाठवावी, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या ‘आस्क’ वृद्धाश्रमासमोरील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून वेळेत मदत मिळाली नाही तर या १५ निराधार आजी-आजोबांवर पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते. समाजाने संवेदनशीलता दाखवत तातडीने मदतीचा हात दिल्यास या वृद्धांना पुन्हा सुरक्षित आश्रय मिळू शकतो.
Editer sunil thorat


