धाडस, जिद्द आणि शौर्याचा नवा इतिहास; API शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी पर्वत सर करून महाराष्ट्राचा गौरव उंचावला…
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी गिर्यारोहण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण मानले जाणारे धौलागिरी पर्वत (८,१६७ मीटर) शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, संपूर्ण राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
धौलागिरी हे शिखर गिर्यारोहकांसाठी अत्यंत कठीण आणि धोकादायक मानले जाते. प्रचंड थंडी, विरळ ऑक्सिजन, अचानक येणारी बर्फवृष्टी, तीव्र वारे, तसेच खोल हिमफट (क्रेव्हासेस) यांसारख्या जीवघेण्या अडचणींना सामोरे जात हे शिखर सर करणे म्हणजे धैर्य, चिकाटी आणि अचूक नियोजनाची खरी परीक्षा असते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ननवरे यांनी अविचल आत्मविश्वास, कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र पोलीस दलातून धौलागिरी शिखर सर करणारे ननवरे हे पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस सेवेत कार्यरत असतानाही साहस आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
अत्युच्च शिखरांवरील सलग विजय
शिवाजी ननवरे हे केवळ धौलागिरीपुरते मर्यादित नसून त्यांनी यापूर्वीही जगातील अनेक अत्युच्च आणि कठीण शिखरांवर यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये
माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६ मीटर),
माउंट लोहत्से (८,५१६ मीटर),
माउंट मकालू (८,४८५ मीटर) आणि
माउंट मनास्लू (८,१६३ मीटर) यांचा समावेश आहे.
या सलग यशामुळे त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य गिर्यारोहकांमध्ये घेतले जाते.
कर्तव्य आणि साहसाचा प्रेरणादायी संगम…
पोलीस सेवेत असताना कर्तव्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत गिर्यारोहणासारख्या अत्यंत कठीण क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी करणे ही दुर्मीळ बाब मानली जाते. ननवरे यांनी आपल्या सेवेत शिस्त, धैर्य आणि समर्पण जपत साहसी क्षेत्रातही उच्चांक गाठला आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलातील जवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, तरुण पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची नवी उंची…
शिवाजी ननवरे यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा गौरव वाढवणारी आहे. “जिद्द, मेहनत आणि धैर्य असेल तर कोणतेही शिखर अशक्य नाही,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, महाराष्ट्र पोलीस दलासह संपूर्ण राज्याला त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे.
Editer sunil thorat



