‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीचा डाव ; लाखोंची फसवणूक, दाम्पत्य फरार…

लोणी काळभोर, ता. २४ : “नर्सरी व्यवसायात मोठा नफा मिळेल” असे आमिष दाखवत एका व्यावसायिकासह अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्याचा भांडाफोड झाला असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीनंतर संबंधित दाम्पत्य फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राममळा, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) व त्याची पत्नी अर्चना किशोर साठे (वय २६, रा. सोरतापवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैनजांगडे यांच्या ओळखीतील किशोर साठे याने ऑक्टोबर २०२५ मध्ये “नर्सरी व्यवसाय” सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. “तुमच्या पत्नीला नर्सरीचा अनुभव असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरेल,” असे सांगून साठे याने त्यांचा विश्वास संपादन केला.
या आमिषाला भुलून जैनजांगडे यांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन लाख रुपये धनादेशाद्वारे तसेच दोन लाख रुपये रोख स्वरूपात साठे याला दिले. काही दिवसांत व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर साठे वेळ काढत टाळाटाळ करत राहिला.
पैसे परत मागितल्यानंतर साठे याने डिसेंबर २०२५ मध्ये २ लाख २० हजार रुपयांचा धनादेश दिला; मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर वटला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैनजांगडे यांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, अधिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून, साठे दाम्पत्याने केवळ जैनजांगडे यांनाच नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांना वेगवेगळ्या व्यवसायांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फकिर इनामदार, परविंदर दिगवा, लकी दिगवा, बाळासाहेब म्हेत्रे यांच्यासह इतर काही जणही या घोटाळ्याचे बळी ठरल्याची माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून किशोर साठे व अर्चना साठे यांचे मोबाईल फोन बंद असून, त्यांनी पुणे शहर सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, “जलद नफा” या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले असून, अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणांपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



