
पुणे हवेली : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे एक वृक्ष, प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष, प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही. असे प्रतिपादन प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले.
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘हरितसेना संलग्न निसर्ग साधना मंडळातील’ शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ महावृक्ष लागवड अभियानाला महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, शिवभक्त मुरलीधर गुजर यांच्या हस्ते झाली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव (प्रशासन )व या विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदरची मोहीम सुरू झाली असून नैसर्गिक संसाधने आणि त्यांचा वापर, त्याचबरोबर झालेली वृक्षतोड व त्यांच्या दुष्परिणाम या सर्व बाबींचा विचार करून सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना संलग्न निसर्ग साधना मंडळाचे सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेश चौरे, सुरेश कोरे, सातगोंडा कांबळे व सर्व शिक्षकवृंद यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी लोणी गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’ व ‘एक पेड माँ के नाम’ अश्या घोषणा देत वृक्षदिंडी काढली व नागरीकांना झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला.
याप्रसंगी विद्यालयात शिसम, आपटा, करंज, बकुळ व जास्वंद, सदाफुली, मोगरा, गुलाब अशा झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच तिर्थक्षेत्र रामदरा माळरानावर पहिल्या टप्प्यात २५० महावृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा व संवर्धन करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर यांनी केले. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे विद्यालयाच्या हरितसेनेच्या प्रमुख शिक्षिका शर्मिला साळुंखे यांनी आभार मानले.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात




