पुणे : राज्यात महायुतीच सरकार येऊन जवळपास वीस दिवसाचा कालावधी उलटून गेला. तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवत आहेत.
या महायुती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.
महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रीपदे देवू नका, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले.
तसेच या चार नेत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी अक्षय कांबळे म्हणाले की, मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तसेच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी मागील काळात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच समाजात तेढ निर्माण करणारी विधाने भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करित आले आहेत.
यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा