राज्यात होणार २० नवीन जिल्हे आणि ८१ तालुके?; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती…

पुणे : महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. राज्यात तब्बल २० नवे जिल्हे आणि ८१ नवे तालुके करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर येथे दिली.
बावनकुळे म्हणाले, “सरकारसमोर नवीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु जोपर्यंत २०२१ ची जनगणना पूर्ण होत नाही आणि तिचा अहवाल येत नाही, तोपर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय घेता येणार नाही.”
जिल्हा निर्मितीची चर्चा कायम…
राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र २०२३ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला होता. प्रत्येक नवीन जिल्हा तयार करण्यासाठी किमान ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने, तसेच मुख्यालयाच्या ठिकाणावरून होणारे राजकीय वाद यामुळे ही प्रक्रिया थांबली होती.
तथापि, नवीन तालुके निर्माण करण्याबाबत सरकार सकारात्मक राहिले आहे. प्रशासन सुलभ करण्यासाठी व स्थानिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हे व तालुके वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
जनगणना अहवालानंतरच निर्णय…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा निर्मितीबाबतचा निर्णय घेण्यासाठी जनगणनेचा अहवाल अनिवार्य आहे. अहवाल आल्यानंतर भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्या यांचा सविस्तर अभ्यास करूनच जिल्ह्यांची निर्मिती करता येईल.
व्हायरल मेसेज खोटे ठरले…
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येईल, विकासाला गती मिळेल असा दावा केला जातो, मात्र या प्रक्रियेसोबत मोठा आर्थिक भार व प्रशासकीय अडचणीही आहेत.
Editer sunil thorat



