
पुणे (हवेली) : “छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आज भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी होते आहे.
असे असताना किमान आजच्या दिवशी तरी शिवरायांचे आचार विचार असलेली खरी भगवी लाट जगभरात पाहायला मिळते. परंतु, ती फक्त आजच्या दिवसा पुरतीच! आजचा दिवस संपला की मग स्वतःला छत्रपतींच्या विचारांवर आम्ही चालतोय असे सांगणारी आजची मंडळी पुन्हा त्यांचे रंग दाखवण्यास सुरुवात करतात. आपल्याला महाराजांचे विचारच कधी कळले नाहीत मग आपण काय त्या विचारांवर चालणार? आपल्याला ते विचार कळले असते तर देशात आज जे काही जाती पाती आणि धर्माच्या नावाने खेळ चालू आहेत धंदे तो खेळ तिथे नसता. या खेळाला जबाबदार आपणच आहोत. कारण राजांनी शिकवले एक आणि आपण करतोय भलतंच! असे प्रतिपादन बाजार समिती पुणे संचालक प्रशांत काळभोर यांनी केले.
सेवाभावी संस्था विश्वरत्न फौंडेशनचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोणी काळभोर येथील अंबरनाथ भाजी मंडई नजीक साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळभोर बोलत होते.
याप्रसंगी साधना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रताप बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, पोलीस पाटील प्रियांका भिसे, अँड. श्रीकांत भिसे, शिवसेना उबाठा जिल्हा संघटक रमेश भोसले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गायकवाड, अभिनव पतसंस्थेचे चेअरमन हेमंत हाडके, सुर्यकांत गवळी विश्वरत्न फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ननवरे, उपाध्यक्ष फयाज इनामदार, सदस्य भरत सारडा, तुळशीराम घुसाळकर, कालीदास काळभोर, अमित गायकवाड. पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, योगेश पैठणे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, वैजनाथ शेलार, महिला पोलिस हवालदार ललिता कानवडे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराज फक्त राजेच नव्हते तर ते एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर भाव या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबाची शिकवण.आपल्याला देशात भगवी लाट हवी आहे. पण ती लाट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि तत्वांची हवी आहे. ही लाट तेव्हाच दिसून येईल जेव्हा आपल्या महाराजांचे गड किल्ले पडक्या अवस्थेत नसून त्यांची दुरुस्ती केली जाईल. आताच वेळ आहे, एकत्र व्हा! आपला आवडता राजकारणी जिंकून येईल आणि गड किल्ले सुधारेल या आशेवर राहिलात, तर पडीक अवस्थेत असलेले गड किल्यांचे अवशेष आणखीन कोसळतील. हातावर हात ठेवून कुणी हे काम करतंय का? याची वाट बघत बसू नका. स्वतःला महाराजांचे खरे मावळे म्हणतं असाल तर हालचाल करा. ज्या संघटना आणि संस्था गड किल्ल्यांची दुरुस्ती करत आहेत, त्यांना फुल ना फुलांची पाकळी म्हणून स्वतःकडून काही तरी मदत करा आणि हे स्वराज्याचे विशाल आणि मौल्यवान धन जपण्यास योगदान द्या.” असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी फौंडेशनचे वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यी आर्यन भालेराव याला लॅपटॉप देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व लोणी काळभोर विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचा पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तुळशीराम घुसाळकर यांनी मानले.



