भारतात वेगाने पसरतोय ‘हा’ धोकादायक त्वचेचा आजार; नेहमीची औषधंही ठरतायत फेल, आरोग्यतज्ज्ञांचा गंभीर इशारा!

सौजन्य फोटो – सोशल मिडिया
मुंबई : भारतामध्ये सध्या एका नव्या आणि धोकादायक बुरशीजन्य त्वचारोगाने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. त्वचेवर साधा नायटा किंवा खाज सुटणारा चट्टा समजून अनेक जण दुर्लक्ष करत असताना, प्रत्यक्षात हा संसर्ग अत्यंत गंभीर आणि उपचारांना कठीण ठरणारा असल्याचे त्वचाविकार तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
‘ट्रायकोफायटन इंडोटिनी’ (Trichophyton indotineae) नावाच्या बुरशीमुळे होणारा हा संसर्ग भारतात झपाट्याने वाढत असून, अनेक प्रकरणांमध्ये सामान्य अँटीफंगल औषधेही निष्प्रभ ठरत असल्याने डॉक्टरांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
त्वचाविकार तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग सामान्य नायट्यापेक्षा खूप वेगळा आणि अधिक आक्रमक आहे. सुरुवातीला त्वचेवर लालसर गोलाकार चट्टे दिसतात, त्यानंतर तीव्र खाज, त्वचेची जळजळ आणि त्वचा सोलण्याची समस्या निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा संसर्ग शरीराच्या मोठ्या भागावर वेगाने पसरत असून, उपचारानंतरही वारंवार परत येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार घ्यावे लागत आहेत.
शारदा केअर हेल्थसिटीचे वरिष्ठ त्वचाविकार सल्लागार डॉ. क्षितीज गोयल यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत भारतात ‘ट्रायकोफायटन इंडोटिनी’ या बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा संसर्ग इतका वेगाने पसरतो की, कुटुंबातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास इतर सदस्यांनाही त्याचा धोका निर्माण होतो.
तज्ज्ञांच्या मते, या आजारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ‘ड्रग रेझिस्टन्स’ म्हणजेच औषधांना दाद न देणे. सामान्यतः नायट्यासाठी वापरली जाणारी अँटीफंगल मलमे आणि गोळ्या अनेक रुग्णांवर परिणाम करत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी संसर्ग पूर्णपणे बरा होत नाही आणि काही दिवसांनी पुन्हा त्वचेवर चट्टे दिसू लागतात. त्यामुळे डॉक्टरांना अधिक काळजीपूर्वक आणि दीर्घकालीन उपचार करावे लागत आहेत.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, स्वतःच्या मनाने औषधे घेणे ही परिस्थिती आणखी गंभीर बनवत आहे. अनेक जण मेडिकलमधून स्टेरॉइडयुक्त क्रीम किंवा मलम घेऊन वापरतात. सुरुवातीला त्याने थोडा आराम मिळाल्यासारखे वाटते; मात्र त्यामुळे संसर्ग आतून अधिक वाढतो आणि नंतर तो अधिक धोकादायक रूप धारण करतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे वापरू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा संसर्ग अतिशय सहजपणे पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या त्वचेच्या संपर्कातून, त्यांचे कपडे, टॉवेल, अंथरूण, जिममधील साहित्य किंवा इतर वैयक्तिक वस्तू वापरल्याने संक्रमण होऊ शकते. याशिवाय उष्ण आणि दमट हवामान, जास्त घाम येणे, घट्ट कपडे वापरणे आणि अस्वच्छता यामुळेही संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.
तज्ज्ञांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. त्वचेवरील खाज सुटणारे चट्टे वेगाने वाढत असतील, शरीराच्या अनेक भागांवर पसरत असतील, औषधोपचार करूनही वारंवार परत येत असतील किंवा नेहमीची औषधे परिणाम करत नसतील तर त्वरित त्वचाविकार तज्ज्ञांकडे तपासणी करून घ्यावी. आवश्यक असल्यास बुरशीची विशेष तपासणी करून योग्य उपचार सुरू करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा संसर्ग सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेणे, वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर न करणे, त्वचेवरील लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे.
Editer sunil thorat



