“अजितदादांचा वारसा सुनेत्रा वहिनींकडेच जावा” – नरहरी झीरवाळ यांचे स्पष्ट विधान…

बारामती (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आता कोण सांभाळणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी (29 जानेवारी) बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झीरवाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचे विधान केले. “अजित पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनीच पुढे यावे, ही पक्षातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना आहे,” असे झीरवाळ यांनी स्पष्टपणे सांगितले. ते पुढे म्हणाले, “आता तुतारी आणि घड्याळ वेगळे राहिलेले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी आधीच एकत्र आलेल्या आहेत आणि यापुढेही त्या एकत्रच राहतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”
झीरवाळ यांनी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची भावना व्यक्त करताना सांगितले की, “सर्वसामान्य जनतेकडून सुनेत्रा वहिनींना नेतृत्वाच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा आहे. नगरपरिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. काही ठिकाणी मतभेद दिसले असले, तरी आता एकत्र येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.”
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या भवितव्यावर निर्माण झालेली धूसरता या विधानामुळे काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता असून, पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे सोपवले जाईल, अशी ही पहिली अधिकृत माहिती मानली जात आहे. यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Editer sunil thorat



